Sunday, January 31, 2016

नटसम्राट Movie Review

नटसम्राट:
नाना पाटेकरांची भूमिका असलेला हा चित्रपट नुकताच पाहिला. त्याबद्दल लिहिण्यापूर्वी मूळ नाटकासंबंधी थोडेसे.
या नाटकातील चट्कन लक्षात येणाऱ्या (आणि राहणाऱ्या) गोष्टी म्हणजे शिरवाडकरांचे पल्लेदार संवाद, उत्कृष्ट अभिनय, मेलोड्रामा…. आणि काही अतिरंजित प्रसंग.  मला तर वाटते की, दोन पिढ्यांमधला संघर्ष, मुलांचे (काही प्रमाणात) स्वार्थी वागणे, मुलांच्या संसारात आई-वडिलांचे सामावले न जाणे आणि त्यामुळे होणारी त्यांची फरफट हाच या नाटकाचा गाभा आहे. अप्पा बेलवलकर हे कोणत्याही क्षेत्रातले यशस्वी व्यक्ती असू शकले असते. या ठिकाणी ते रंगभूमीवरील यशस्वी नट असणे ही एक कथानकाची सोय (Plot Device) आहे, की ज्यामुळे त्यांच्या तोंडी नाट्यपूर्ण संवाद घालता आले. अतिरंजित अशा करता म्हणतो की, काही प्रसंग पटत नाहीत. उदाहरणार्थ, एक चांगल्या घरातली मुलगी आपल्या आई वडिलांवर चोरीचा आळ घेईल हे संभाव्य वाटत नाही. असो.
चित्रपटाचे कथानक हे Flashback पद्धतीने समोर येते. एका जळून खाक झालेल्या नाट्यगृहात अप्पासाहेब जातात आणि तिथे उफाळून येणाऱ्या त्यांच्या आठवणींतून त्यांचा जीवनपट उलगडत जातो. पटकथेची ही वीण अतिशय सुरेख आहे. मूळ नाटकातले संवाद जसेच्या तसे घेण्याचा मोह टाळला आहे. (अपवाद अर्थातच अप्पासाहेबांची स्वगते). नव्याने लिहिलेले संवाद देखील अधूनमधून विनोदाचा शिडकावा असल्याने उगाचाच जड वाटत नाहीत. काही प्रसंग नव्याने घातले आहेत. पण ते कथानाकाला पूरक असल्याने उपरे वाटत नाहीत. जसे, Othello या नाटकाचा नवीन (आणि आचरट) आविष्कार पाहून अप्पासाहेब भडकतात  हा प्रसंग अतिशय उठावदार झाला आहे.
काही पात्रे नव्याने आली आहेत. रामभाऊ या पात्राचे प्रयोजन कळत नाही. कदाचित, अप्पासाहेबांच्या कलंदर आणि काहीश्या बेबंद जीवनाचा एक साक्षीदार असे त्याचे स्वरूप असावे. विक्रम गोखलेंनी ही भूमिका खूप छान केली आहे. विशेषत:, रामभाऊ आणि अप्पासाहेब, बोलता बोलता नाटकातल्या एका प्रसंगात 'शिरतात' आणि अगदी सहज पणे नाटकातले (कर्ण आणि कृष्णाचे) संवाद बोलू लागतात हा प्रसंग रंगतदार झाला आहे. मला वाटते, शिरवाडकरांच्याच 'कौन्तेय' नाटकातले हे संवाद असावेत. 
मेधा मांजरेकर यांची 'सरकार' अतिशय हृद्य साकारलेली आहे. अप्पासाहेबांच्या अव्यवहारी निर्णयाबद्दल केलेला त्रागा (आणि तरीही त्यांच्याबद्दल असलेले प्रेम आणि आदर), मुलीने केलेल्या आरोपामुळे आलेला संताप आणि शेवटी असहायता या सर्व भाव भावना त्यांनी उत्कटतेने व्यक्त केलेल्या आहेत.

 मृण्मयी देशपांडेचा अभिनय लक्षणीय. सुनील बर्वे आणि नेहा पेंडसे यांची कामे ठीकठाक.
आणि नाना फटेकर. त्यांच्याबद्दल काय लिहावे? डॉ. लागू, दत्ता भट यांसारख्या दिग्गज कलाकारांनी एकेकाळी अजरामर  केलेली भूमिका नव्याने सादर करणे हेच एक मोठे आव्हान. पाटेकरांनी ते सहज पेलले आहे, आणि आपल्या शैलीने  अप्पासाहेब रंगवले आहेत. … असा नट पुन्हा न होणे हेच खरे.
दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांना full marks. चित्रपट मध्यम आणि त्यातील अवकाश (space) यांचा पुरेपूर वापर करून, हा अवघड चित्रपट परिणामकारक रित्या प्रेक्षकांसमोर ठेवण्यात ते १००% यशस्वी झालेले आहेत.

संपूर्ण नटसम्राट टीमचे मन:पूर्वक अभिनन्दन.

- नरेंद्र जोशी

No comments:

Post a Comment